“तू आनंदी का दिसत नाहीस?” – IT मधील नवा प्रश्न, साधारण 28 च्या आसपासचा मुलगा,त्याला IT किंवा तश्याच प्रकारच्या क्षेत्रातील बायको,एखादी परदेशवारी झालेली,कदाचित फ्लॅट बुक केलेला आणि कार पण.ही बहुतेक एकुलती किंवा भाऊ-बहीण एवढाच संसार असलेली मध्यमवर्गीय पोरं.कधीतरी ,पोरगा सेट झाला असे म्हणत म्हणत आईबाबानां काहीतरी चुकल्याचे कळायला लागते आणि शेवटी हा प्रश्न विचारला जातो, तू आनंदी असल्यासारखा का वाटत नाही,सतत तणाव वैगरे.
जिल्ह्या,तालुक्यातून आपला मुलगा इंजिनरिंग किंवा mca करून छान It ला लागला आणि आता लग्न सुद्धा झालेले म्हणून कर्तव्य पूर्ती चे सर्टिफिकेट घेताना हे असे काही नवेच समोर येईल अशी शक्यता त्यांचा गावी नसते.व्यसन किंवा लग्नातील विसंवाद नाहीये हे त्यांना पालक म्हणून कळलेले असते. त्या काकांच्या मुलाला 2008 साली काढले तसे काही आहे का?तुला काम जमत/आवडत नाही का पासून ते बॉस त्रास देतो का,आमची चिंता नको करू पर्यंत सगळे विचारून झालेले असते.त्यात कहर म्हणजे कधी नौकरी वगैरे गेली तर आम्ही सांभाळून घेऊ सुद्धा म्हणून झालेले असते.आणि त्यावेळी आपले नेमके काय विचकलेले आहे हे त्यांना कधीही न सांगण्याचा त्या मुलाचा विचार पक्का झालेला असतो.
ह्या सगळ्या प्रकाराची सुरवात होते ती मुलाने संसार थाटायला सुरवात केली तेव्हा पासून.गरिबीतून घर वर काढले किंवा परिसरात नाव काढले असे माझ्या म्हणजे 2000 च्या आसपास डिग्री झालेला पिढीला असलेले आंतरिक बळ ह्या नवीन पिढीकडे नसते.साधारण लीड पदाला असल्याने ,शर्थ केली तरी इतक्या फास्ट बदलणाऱ्या तंत्र जगात आपण नेहमीच रेलवंट,आचिवर राहूच असे नाही हे कळून चुकले असते .आपण पुण्याच्या किंवा कुठल्या शाहरील दूरच्या उपनगरातील आनेक्स मध्ये घेतलेला फ्लॅट आपल्याला सहज परवडलेला नाही.तसा तो फ्लॅटपण काही खास नाही.आणि आपले घर जसे होते त्याच्या जवळपास सुद्धा तो येत नाही.हे सत्य हळूहळू,एखाद्या काटा रोज थोडा थोडा खोल रुतत जावा तसे उमगलेले असते.त्यात मग मुलाचे कौतुक करायला म्हणून रिसोडहुन मुद्दाम आलेले आजी किंवा आई ह्या फ्लॅट चे दार दिवसभर उघडे ठेवते.पण तरी कोणी येताजाता ‘काय चालले” म्हणून विचारत नाही,नसतेच कुणी,सगळे संध्याकाळी पार्क मध्ये भेटणार असतात.हे तिला जाणवून… पण त्याला जाणवू नये म्हणून ..
काहीतरी कारण काढून ..पटकन गावी परत जाणारी आजी/आई गेली की तो फ्लॅट मुलाच्या मनातून उतरतो.प्रश्न किंमत,अंतर किंवा आकाराचा नसतो.शेजाराचा तर नासतोच नसतो.आपल्या नकळत, विचारात नसताना सुद्धा, घर म्हणून आपले काहीतरी मोघम पण निश्चित असे आराखडे होते हे त्याला अचानक कळलेले असते. ह्यात मग संसार किंवा जीवन म्हणून सुद्धा आपले काही आराखडे होते हे त्यादिवशी कळले तेव्हा मुलगा माणूस झालेला असला तरी भावनिक दृष्टया फासलेला असतो. ठरवून न निवडलेले जीवन आणि माहीत नसलेली आवड ह्यात. कुणी IIM किंवा ग्रीन कार्ड च्या मागे लागलेला असला की तो ह्यातून सुटतो,काही वर्षांसाठी. मुळात एक दोन भावंडं असलेली ही पिढी,लाडकी असली तरी खूप हळवी असतात.आपले छोटे घर,आई-बाबा,शेजार-शाळा ह्यांच्या बद्दल त्यांच्या भावना इतक्या खोलवर असतील ह्याचा अंदाज माझ्या 80 च्या पिढीला जरासा आलेला असला तरी त्यांच्या पालक असलेला 60, 70च्या पिढीला आलेला असतोच असा नाही.घरी फार काही आर्थिक पीळ नसला तर 50 हजार ते लाख भरात पगार असला तरी त्यात “अर्थ” नसतो.तिकडे आई-बाबा मात्र “मस्त एन्जॉय करा बरका” असे ,आपले अपुरे स्वप्न आपले मूल जगतंय म्हणून खुश होतात.कधीतरी फोन करून मुलगा विषय काढतो,हळूच.गावात काही व्यापार असेल तर तिकडे जॉईन करू शकतो मी !किंवा आपल्याकडे काही साधा जॉब असता तर बरे झाले असते नाही?ह्याला इकडे करमत नसते…..
हे बोलताना बरेचदा रागावलेले बायको दिसली तरी तिला नजरंदाज करण्याची हिंमत त्याने केलेली असते.पण बाबाला काही ह्याचे मन समजत नाही.
माझे आता वय म्हणून झालेलं असल्याने साधारण महिन्याला एक तरी कुणी असा विषय घेऊन येतो. “आम्ही येथे खूप काही ग्रेट करत नाही हो,त्यापेक्षा तुमच्या सोबत/जवळ असतो तर बरे होते” हे असे संगायला जमत नाही.लायकीचे ओझे म्हणतात ते हे.
त्यात काही मुलाच्या पालकांना वेळेत अंदाज आला…. तर काहींनी स्पष्ट विषय काढला.बहुतेक पोरं घरी काहीतरी व्यापार,धंदा किंवा स्वतःच काही नेमका प्लॅन असलेले आहेत. आणि सुखी आहेत.फॅक्टरी,स्विमिंग पूल-जिम,ट्युशन,तिकडेच स्टार्टअप ते दुकान/प्रतिष्ठानाचा शाखा विस्तार असे विविध प्रकार केलेत.बायकोची साथ होती मात्र !
ज्यांना हे जमले नाही ते पण सुखीच आहेत पण संधीची वाट बघताहेत. ह्यात मुलींना फारसा चॉईस नसतो,तरी एक म्हणालीच “सर,मला वाटते काही मोठी मंदी, युद्ध व्हावे आणि परत जाता यावे”. हे असे सगळयांचे होते असे माझे म्हणणे नाही,पण हे असे असू शकते ,आपली मुल पैश्यापेक्षा भावनिक स्थिरता,अर्थ असे काही शोधू शकतात आणि त्याला कदाचित हे मांडता येत नाहीत हे पालकांना माहीत पाहिजे.नाहीतरी तुझाकडे सगळे असून आनंदी का दिसत नाहीस ? हा प्रश्न असह्य होऊन अगदी 100 टक्के अस्सल वाटेल असे उत्तर पण वाठवायला शिकेन तो.आता 22 ला असलेली पिढी ते शिकूनच येतेय.त्यांना घर किंवा कार घायचीच नाहीये,एका कंपनीत फार काळ टिकण्या पेक्षा पटापट पैसे घेऊन आपले काही सुरू करणायचे मनसुबे घेऊन आलेले हे फ्रेशर कदाचित जास्त सुखी असतील.पण निव्वळ गरिबीतून आलेलो मी/आम्ही आणि अस्थिरतेवर आरूढ ही नवी फ्रेशर पिढी ह्यामधील संक्रमण काळातील ,आता तिशीला जाणारी पिढी मात्र फसलेली दिसते.मला आवडलेले लहानपण आणि मला पाहिजे असलेले भविष्य हे ह्या इंजिनियर,IT नौकरित नाहीये हे आपल्या पालकांना सांगा रे बाबांनो.अशी घुसमट होत असले तर बोला.नाहीतर हा मेसेज आपल्या काका,मामांना पाठवा ते पोचवतील तुमच्या आई-बाबा पर्यंत.
तुमचा,
दीक्षित दादा.